भारतातील खाद्य तेलांच्या किमती का वाढत आहेत?

        भारतातील लोकसंख्या वर्षानुवर्षे वाढत असून तेथील खर्च करण्याची क्षमता व खाण्यापिण्याच्या सवयी यांमध्ये घडून आलेला बदल खाद्यतेलाची गरज तितक्याच वेगाने वाढवत गेला. भुईमूग, सोयाबीन, वनस्पती, सूर्यफूल,पाम, मोहरी अशा 6 मुख्य पिकांपासून बनलेले खाद्यतेल भारतामध्ये उपलब्ध आहे.देशाच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, खाद्यतेलांच्या किमतीमध्ये मागील 1 वर्षापासून 20 ते 50 टक्के इतक्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. तर आजच्या या लेखामधून भारतातील खाद्यतेलाच्या किमतीवर कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो याबाबत माहिती जाणून घेवूया.

          कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतातील खाद्यतेलाची एकूण गरज 23 ते 25 मेट्रिक टन (वर्ष->2015-2019) इतकी आहे, त्यापैकी 8 ते 10 मेट्रिक इतकी पूर्तता देशांतर्गत केली जाते व उरलेल्या 13 मेट्रिक टन म्हणजेच 56% खाद्य तेलाची आयात बाहेरील देशांतून करण्यात येते ज्याची किंमत 61 हजार 559 करोड इतकी आहे. भारतामधील सोयाबीन खाद्य तेलाच्या एकूण गरजेपैकी 85% अर्जेंटिना आणि ब्राझील या देशांतून आयात करण्यात येते,तसेच पाम तेलाच्या एकूण गरजेपैकी 40% हे देशांतर्गत बनवले जाते व 60 % इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांतून आयात केले जाते. त्याचप्रकारे सूर्यफूल खाद्यतेलाच्या एकूण गरजेपैकी 90% टक्के युक्रेन आणि रशिया या देशांतून आयात केले जाते. 
       खाद्यतेलाची किंमत वाढण्याची कारणे-

1. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि पाम तेलाच्या वाढलेल्या किंमतींचा परिणाम भारतामधील खाद्यतेलावर झालेला दिसतो.

2. अमेरिका आणि ब्राझील यांसारख्या देशांनी अपारंपारिक इंधन म्हणून या इंधनाचा वाहनांमध्ये उपयोग करण्यास सुरुवात केल्याने खाद्यतेलाकडे होणारा पुरवठा कमी झालेला आहे. तसेच यांपासून मिळणाऱ्या इंधनाचा उपयोग करून पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्याकडे या देशांचा कल वाढलेला दिसतो.

3. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन या देशाने जास्तीत जास्त प्रमाणात खाद्यतेलाची खरेदी करून ठेवल्याने त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात जाणवत आहे.

4. मलेशिया जगातील सर्वात जास्त पाम खाद्यतेल उत्पादक देश मानला जातो. या उत्पादनामध्ये जास्त प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. कोरोनाच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमा बंद असल्याने मजुरांची कमतरता व प्रतिकूल नैसर्गिक हवामानामुळे पाम तेलाचे भाव वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

5. अर्जेंटिना, युक्रेन, रशिया, अमेरिका यादेशांमध्ये नैसर्गिक बदलामुळे पिकांची नियमित पेरणीपेक्षा कमी लागवड झाल्याने त्याचा परिणाम येणाऱ्या काळात भारतीय खाद्यतेलांच्या किमतीवर दिसून येऊ शकतो.

    खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकारसमोर उपलब्ध असलेले पर्याय-

1. आयात केलेल्या खाद्यतेलावर 35 टक्‍क्‍यांपर्यंत कर आकारला जातो. जरी सरकारने यावरील कर कमी करायचे ठरवले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्य तेलाचा भाव वाढवला जातो, कारण ज्या प्रमाणात याचा तुटवडा सध्या भासत आहेत त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.

2. पुढील 4-5 महिन्यात जेव्हा या पिकांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने येईल तेव्हा या किमती कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

3. काही तज्ञांच्या मतानुसार, सबसिडी उपलब्ध करून गरीब व गरजू लोकांना राशन व्यवस्थेद्वारे गरजेपुरते खाद्यतेल उपलब्ध केले जाऊ शकते.

या लेखातून आपण सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर विश्लेषणात्मक माहिती येथे प्रस्तुत केली आहे. अशाच प्रकारच्या विषयांवरील लेख आम्ही पुढील काळातही आपणासाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद!

Leave a Comment